Wednesday, 7 November 2018

दिवाळीत किल्ला का करतात?






कधीपासून हि प्रथा सुरु झाली आहे? कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. लहानपणी किल्ला करताना हे सारे प्रश्न पडायचे. पण उत्तर मात्र मोठे होताना सापडलं. यामागच शास्त्र , कारण बाकीच्यांसाठी काय आहेत मला माहित नाही पण माझ्यासाठी मात्र या प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि या प्रश्नाच उत्तर विचार करायला लावतच.

फार पूर्वीपासून दिवाळी साजरी केली जाते भारतात. पण दिवाळी या शब्दाला खरा अर्थ स्वराज्यात प्राप्त झाला.
सण साजरे करायचे तर परिस्थिती तशी लागते. जेव्हा आपला भारत, आपला महाराष्ट्र गुलामगिरीत जगत होता , सुराज्य हे फक्त स्वप्न बनून राहिले होते तिथे कसले आले सण आणि कसला उत्साह.

हा उत्साह , विश्वास देण्याच काम केल स्वराज्याने. शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होत. लोकांना सुरक्षितता होती आणि शोषण थांबल होत. लोक खरोखर सुराज्य , रयतेच राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते.
त्यानंतरच दिवाळीला खरा अर्थ प्राप्त झाला . स्वाभिमान जागृत झालेली मानस आता गुलामीतून बाहेर येत होती .
हे सर्व पाहायला मिळत होते स्वराज्याच , घरच रक्षण करणाऱ्या गड किल्ल्यांमुळे . उन , वारा , पाऊस यांचा सामना करत , अनेक संकटांना तोंड देत परंतु आपल्या कर्तव्यापासून कधीही मागे न हटणारे हे किल्ले , हे गड . आपल्या सर्वांना प्रेमाने रक्षणारे हे किल्ले, स्वराज्याचे आधारस्तंभ . आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी पण किती प्रेम कराव या गडकोटांवर. स्वतःच्या लेकरांप्रमाणे मराठ्यांनी हे गड सांभाळले. मग एवढ प्रेम, एवढा आदर का असाच होता, त्याचे समाजात प्रतिबिंब दिसू नये का? आणि म्हणूनच एक आदराच आणि प्रेमाच प्रतिक आणि घराच रक्षण करणारा किल्ला हा प्रत्येकाच्या घराबाहेर मग दिसू लागला.
दिवाळी म्हणाल कि समृद्धीच प्रतिक आणि समृद्धीच कारण म्हणजे आजही आपले कर्तव्य बजावणारे आणि दिमाखात उभे असलेले हे किल्ले . 
यापेक्षा दुसर कारण माझ्यासाठी तर नाही .

कोण म्हणुनी काय पुसता आम्ही शिवबाचे मावळे
गडकोट नाहीत नुसते आम्हास भासती देवळे

जय शिवराय

No comments:

Post a Comment